एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जयंत पाटील उतरले; रोहित पवारांची अध्यक्ष-सचिव बदलाची मागणी

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जयंत पाटील व रोहित पवारांचा सहभाग. MPSC चे अध्यक्ष व सचिव बदलून पारदर्शक भरती प्रक्रियेची मागणी.

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि प्रशासकीय ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ पुण्यात हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या आक्रमक 'आक्रोश मोर्चाला' आता तीव्र राजकीय पाठबळ मिळू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी थेट पुण्यात जाऊन या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि शासनाचा निषेध करण्यासाठी काळा शर्ट परिधान करत चक्क गाडीवर चढून राज्य सरकार व MPSC प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.

      विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुण्यात काढण्यात आलेल्या या विराट मोर्चावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करत दिवस-रात्र काबाडकष्ट करून अभ्यास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पेपर फुटीसारख्या प्रकारांमुळे पाणी फेरले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांना कठोरपणे आळा घालून एक अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा यंत्रणा उभारणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या मनातील असंतोष ओळखून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

       दरम्यान, आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेले आमदार रोहित पवार यांनी सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. हा विद्यार्थ्यांचा स्वतःहून लोटलेला जनसागर असून ही कोणतीही आणलेली किंवा पुरस्कृत गर्दी नाही, असे स्पष्ट करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पैशांच्या मोहात पडून अधिकारी व नेत्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे गरीब मुलांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. MPSC मधील कारभार सुधारण्यासाठी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव पद बदलून तिथे पूर्णपणे स्वच्छ प्रतिमेच्या आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.      

     पुण्यात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू करण्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले आणि सरकार या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला व रोषाला घाबरले आहे का, असा संतप्त सवाल विचारला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या या तीव्र आंदोलनामुळे पुण्यातील वातावरण सध्या चांगलेच तापले असून, शासन यावर काय ठोस भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पेपरफुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; टास्क फोर्सवर सवाल

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software