पेपरफुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; टास्क फोर्सवर सवाल

स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीवरून खासदार संजय राऊत आक्रमक. सरकारचा टास्क फोर्स निष्फळ असल्याचा आरोप करत आरोपींचे भाजपशी कनेक्शन असल्याचा दावा.

मुंबई: राज्यभरात गाजत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणा वरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. राज्य सरकारने पेपरफुटी प्रकरणांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष 'टास्क फोर्स'च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच, गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्तेत असलेल्या नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवर त्यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे. पुण्यात आणि लातूर मध्ये उघडकीस आलेल्या पेपरफुटी प्रकरणां मधील आरोपी हे थेट सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचा गंभीर दावाही त्यांनी यावेळी केला.

          माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राज्य शासनाच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. मागील दहा वर्षांपासून राज्यात एकाच पक्षाचा प्रभाव असताना आता अचानक टास्क फोर्स नेमण्याची वेळ का आली, असा सवाल त्यांनी विचारला. राज्यात सक्षम पोलीस दल आणि शासकीय यंत्रणा कार्यरत असताना एका यंत्रणेवर दुसरी यंत्रणा लादण्याचा घाट का घातला जात आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला. नीट (NEET) असो वा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा युपीएससी (UPSC) परीक्षा, या सर्व पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या रॅकेटमध्ये बहुतांश ठिकाणी भाजपशी संबंधित कार्यकर्ते किंवा व्यक्ती अडकल्याचे समोर आले आहे, असा दावा त्यांनी केला. यापूर्वी कोणत्याही विशेष टास्क फोर्स शिवाय लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया सुरळीत पार पडत होती, मग आताच ही नवी यंत्रणा जिल्ह्यात जिल्ह्यात फिरवण्याची वेळ का आली, अशी विचारणा त्यांनी केली.

       यावेळी बोलताना राऊत यांनी केवळ पेपरफुटीच नव्हे, तर इतर मुद्यांवरही भाजपला लक्ष्य केले. अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या दानपेटीतील कारभारावर आणि व्यवस्थापनावर बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. मंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी पूर्वी पारंपरिक पुजारी असायचे, मात्र आता तिथे थेट एअर मार्शलला आणून सीईओ बनवावे लागत आहे, यावरून मंदिराच्या व्यवस्थापनात निर्माण झालेली स्थिती स्पष्ट होते, असे ते म्हणाले. राम मंदिराच्या व्यवस्थेलाही त्यांनी सोडले नाही, तर मग सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या भविष्याला ते काय सोडणार, असा टोकदार सवाल त्यांनी केला.

        तसेच, सार्वजनिक सण आणि डीजे बंदीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी प्रशासकीय धोरणांवर बोट ठेवले. डीजे बंदीच्या निर्णयावरून आणि राज्यांमधील स्थितीवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दोन्ही राज्यांमधील राजकीय परिस्थिती आणि निर्णयांची तुलना करताना त्यांनी, जर असे निर्णय विरोधी पक्षांच्या काळात झाले असते तर भाजपने मोठा आकांडतांडव केला असता, असे नमूद केले. पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आणि संजय राऊतांच्या या आक्रमक भूमिके मुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पेपरफुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; टास्क फोर्सवर सवाल

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software