साताऱ्याच्या जडणघडणीतील योगदानाचा गौरव, किसन वीर जयंतीनिमित्त सोहळ

वाईतील कवठे येथे क्रांतिवीर किसन वीर जयंती सोहळा संपन्न. पालकमंत्री शंभूराज देसाई व मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत अभिवादन.

सातारा: सातारा जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्राच्या जडणघडणीत अनेक ज्येष्ठ नेत्यांचा मोलाचा हातभार लाभला असून, यामध्ये देशभक्त क्रांतिकारी किसन वीर यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आणि जिल्ह्याला नवी दिशा देणारे ठरले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. वाई तालुक्यातील कवठे येथे स्वातंत्र्यसेनानी तथा सहकार महर्षी कै. देशभक्त क्रांतिवीर किसन वीर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

      कवठे येथील क्रांतिवीर किसन वीर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, वाई पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे, उपसभापती वर्षा जगताप, कवठे गावच्या सरपंच मानली पोळ, सत्यजित वीर यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.

       याप्रसंगी बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, देशभक्त क्रांतिवीर किसन वीर आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांसारख्या दूरदर्शी नेत्यांनी सातारा जिल्ह्यात मजबूत सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले. याच भक्कम पायामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला व दुधाला योग्य भाव मिळत असून, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज राज्यातील अग्रणी बँक म्हणून नावारूपाला आली आहे. स्थानिक शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊनच किसन वीर यांनी साखर कारखान्याची पायाभरणी केली होती, राज्याच्या आणि जिल्ह्याच्या प्रगतीत त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

         या कार्यक्रमात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी देखील किसन वीर यांच्या दूरगामी विचारांचा गौरव केला. देशभक्त क्रांतिवीर किसन वीर यांच्या दूरदृष्टीमुळेच जांब येथे सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली, ज्याचा प्रत्यक्ष लाभ आजूबाजूच्या पाच तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांची मुले शिकावीत आणि त्यांची सर्वांगीण आर्थिक प्रगती व्हावी, या उदात्त हेतूने त्यांनी 'जनता शिक्षण संस्थेची' स्थापना केली, जिथे आज सुमारे पाच हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांच्या पिकांना बारमाही पाणी मिळावे यासाठी धोम धरणाची उभारणी करण्यातही त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी दिलेले विचार आणि विकासाची दिशा डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

ध्वनि मर्यादा ओलांडणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, साउंड सिस्टिम जप्त होणार

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software