- Hindi News
- देश
- अभिजीत दीपकेच्या आंदोलनानंतर आपची मोठी खेळी; अरविंद केजरीवालांचा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावर म...
अभिजीत दीपकेच्या आंदोलनानंतर आपची मोठी खेळी; अरविंद केजरीवालांचा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चाचा एल्गार
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अरविंद केजरीवालांची मोठी राजकीय खेळी. E-20 इंधनाच्या मुद्द्यावर पंतप्रधान निवासावर काढणार मोर्चा.
नवी दिल्ली: देशभरात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी उभारलेल्या ऐतिहासिक आंदोलनानंतर आता राजकारणात मोठी उलथा पालथ पाहायला मिळत आहे. नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतरमंतर वर झालेल्या भव्य आंदोलनामुळे केंद्र सरकारला मोठे धक्के बसले असून, याच आंदोलनाच्या रेट्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाला मिळालेला अभूतपूर्व जन प्रतिकार पाहता, आता आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकार विरोधात मोठे जन आंदोलन उभे करण्याची रणनिती आखली आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'च्या यशस्वी पॅटर्नचा धागा पकडत केजरीवालांनी आता 'E-20 इंधना' च्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
आम आदमी पार्टीने E-20 इंधनाच्या मुद्यावर केंद्र सरकार विरोधात रान उठवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमे अंतर्गत दोन लाखांहून अधिक लोकांकडून ऑनलाइन याचिकेवर सह्या मोहिमेचा टप्पा पार पाडण्यात आल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांच्याकडून केला जात आहे. या आंदोलनाला अधिक तीव्र रूप देण्यासाठी केजरीवाल यांनी थेट ४ ऑगस्ट रोजी आपल्या १०० निवडक समर्थकांसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या आंदोलना दरम्यान लाठीमार झाला किंवा तुरुंगवासाची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशारा देत त्यांनी केवळ न घाबरणाऱ्या समर्थकांनाच आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले आहे.
देशात नुकतेच अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते आणि मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच अशा जन आंदोलना समोर सरकारला झुकत काही मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्या. आता याच धर्तीवर अरविंद केजरीवाल यांनी E-20 इंधनाचा विषय हातात घेत थेट पंतप्रधानांच्या घराकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, या संपूर्ण राजकीय घडामोडीत 'आप'ने या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीला जाणीवपूर्वक दूर ठेवल्याची चर्चा रंगली आहे. आंदोलनाचे संपूर्ण श्रेय दुसऱ्या कोणत्या संघटनेकडे जाऊ नये आणि जसे कॉकरोच जनता पार्टीला तरुणांचे अफाट समर्थन मिळाले, तसेच राजकीय व जनसमर्थन आपल्यालाही लाभावे, यादृष्टीने अरविंद केजरीवाल यांनी ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी राजकीय खेळी खेळल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या नवीन आंदोलनामुळे आता राष्ट्रीय राजधानीतील राजकीय तापमान पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.
