- Hindi News
- पुणे
- निगडी प्राधिकरणातील चेंबरमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू; वर्षभरात पाच बळी
निगडी प्राधिकरणातील चेंबरमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू; वर्षभरात पाच बळी
निगडी प्राधिकरणात चेंबरमध्ये अडकून अमोल शिंदे व मनोज शिंदे या २ कामगारांचा मृत्यू. वर्षभरात एकाच मॅनहोलमध्ये ५ कामगारांचा बळी गेल्याने नागरिक आक्रमक.
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. लोकमान्य हॉस्पिटल जवळील एका धोकादायक चेंबरमध्ये अडकून दोन तरुण कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली असून, प्रशासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार आणि सुरक्षेच्या अभावा विरोधात स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा जीवघेण्या दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अमोल शिंदे (वय २०) आणि मनोज शिंदे (वय २६) अशी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या दुर्दैवी कामगारांची नावे आहेत. प्राप्त माहिती नुसार, मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दोन्ही कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटना स्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अतोनात प्रयत्न करून दोन्ही कामगारांना चेंबरबाहेर काढले आणि उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारा पूर्वीच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. या दोन्ही कामगारांचा मृत्यू नेमका श्वास गुदमरून की अन्य कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
या घटनेतील सर्वात चिंताजनक आणि संतापजनक बाब म्हणजे, याच मॅनहोल किंवा चेंबरमध्ये सुमारे वर्षभरापूर्वी काम करताना बीएसएनएलच्या तीन कामगारांचाही अशाच प्रकारे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकाच ठिकाणी घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत एकूण पाच कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. वर्षभरापूर्वी एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही प्रशासनाने या धोकादायक चेंबरच्या सुरक्षितते बाबत कोणतीही खबरदारी किंवा उपाय योजना का केली नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. संबंधित यंत्रणेच्या स्पष्ट हलगर्जीपणामुळेच निष्पाप कामगारांना बळी जावे लागत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी प्रशासना विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
