हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न पेटला; खराब रस्त्यांविरोधात आंदोलनाचा इशारा

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथे खराब रस्ते व वाहतूक कोंडीविरोधात आयटी कर्मचारी आणि नागरिक आक्रमक. ७ दिवसांत बैठकीची मागणी, आंदोलनाचा इशारा.

पुणे:चाकणमधील आंदोलनाची धग आता पुण्याच्या प्रमुख आयटी केंद्रापर्यंत पोहोचली आहे. हिंजवडी-मान-मरुंजी परिसरातील राजीव गांधी आयटी पार्कमधील खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा आणि रखडलेल्या पायाभूत सुविधांमुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि आयटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने आता नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हिंजवडी परिसरात गेल्या काही वर्षांत आयटी कंपन्या तसेच मोठ्या निवासी सोसायट्यांचा झपाट्याने विस्तार झाला. त्यानुसार परिसरातील लोकसंख्येतही मोठी वाढ झाली. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रस्ते, सार्वजनिक वाहतूक, पाणी पुरवठा आणि इतर नागरी सुविधांचा अपेक्षित विकास झालेला नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे रोज कामा निमित्त या परिसरात ये-जा करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

परिसरातील रस्त्यांची अवस्था विशेष चिंतेचा विषय बनली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि रस्त्यांवर उडणारी धूळ यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढत असून, अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. या समस्यांवर तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रस्तावित रस्ते आणि रुंदीकरणाच्या कामांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, बाधित जमीन मालकांना कायद्या नुसार योग्य मोबदला द्यावा आणि रस्त्यांच्या कामांना विलंब न करता सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मान ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक ३चे काम वेगाने पूर्ण करून प्रवासी सेवा लवकर सुरू करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यास हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात नागरिकांनी आता थेट राज्य सरकारकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील सात दिवसांत विशेष बैठक घेऊन हिंजवडी-मान-मरुंजी परिसरातील पायाभूत सुविधांबाबत ठोस निर्णय घ्यावा, असा अंतिम इशारा देण्यात आला आहे. या मुदतीत ठोस कार्यवाही न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिक, शेतकरी आणि आयटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

यासोबतच हिंजवडी, मान, मरुंजी आणि लगतच्या परिसराचा नियोजनबद्ध व एकात्मिक विकास करण्यासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याची मागणीही जोर धरत आहे. वाढती लोकसंख्या, आयटी उद्योगाचा विस्तार आणि नागरी सुविधांवरील वाढता ताण लक्षात घेता या क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हिंजवडी आयटी पार्क हे राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असतानाही मूलभूत सुविधांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे नागरिकांचा असंतोष वाढत आहे. त्यामुळे आगामी सात दिवसांत प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात होते का, याकडे आता स्थानिकांसह आयटी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती

Latest News

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती
हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत विधान भवनात बैठक. उपसभापती सचिन अहिर व मंत्री नरहरी झिरवाळ यांचे...
चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्याची नवी झेप; २,३२० कोटींच्या गुंतवणुकीने विकासाला वेग
नेपाळच्या पुरात भारतीय पर्यटक संपर्कविहीन; महाराष्ट्र सरकारकडून विशेष हेल्पलाईन सुरु
अनाथ, दिव्यांग मुलींच्या हस्ते राज्यपालांना राखी; लोकभवनात रक्षाबंधन उत्साहात
महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य; ‘उमेद’ अभियानातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software